
प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर | ५ ऑगस्ट २०२५
देशभरात गाजत असलेल्या *नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या मुद्द्यावर आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री *देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींसोबत नांदणी मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्र शासन नांदणी मठाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हत्तीणी महादेवीची घरवापसी ही केवळ मठाची नव्हे तर जनतेच्या भावनेची बाब असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात शासन आणि मठ संयुक्तपणे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, हत्तीणीच्या आरोग्याची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारनेही स्वीकारली आहे. त्यामुळे वन विभाग आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने मठाच्या आवारातच महादेवीसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी लवकरच संयुक्त समिती स्थापन करण्याचाही विचार करण्यात येत आहे.

या प्रकरणात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबतही मुख्यमंत्री महोदयांनी गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
या उच्चस्तरीय बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री *अजित पवार, **वनमंत्री गणेश नाईक, **उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, **कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, **वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार **धैर्यशील माने, आमदार **राहुल आवाडे, **अशोकराव माने, **सदाभाऊ खोत, **राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार **राजू शेट्टी, माजी आमदार **प्रकाश आवाडे, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष **ललित गांधी, जिल्हाधिकारी **अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक *योगेशकुमार गुप्ता, वन विभागाचे अधिकारी आणि नांदणी मठाचे विश्वस्त उपस्थित होते.

ही बैठक झाल्याने नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. जनतेच्या भावना, मठाचा इतिहास आणि हत्तीणीचे संरक्षण यांचा विचार करून हा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.