“केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दरबारी बनल्यात, त्यांचाच अजेंडा चालवतात”; ठाकरे गटाची टीका

0
46

Thackeray Group Vs BJP: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून विरोधकांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातही काही नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे.

अनेकांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात येत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीनेही सरकारवर निशाणा साधला आहे. यातच ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

विरोधकांना घेरण्यासाठी भाजपा कोणत्याही थरला जाऊ शकते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि निवडणूक आयोग या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या दरबारी झाल्या आहेत.

भाजपाचाच अजेंडा चालवला जात आहे. भाजपासाठीच काम करत आहेत. भाजपाच्या प्रचार मोहिमेचा एक भाग होत आहे. हे देशासाठी दुर्दैवी आहे. विरोधी पक्षातील जे नेते भाजपासोबत गेले आहेत, ते सांगतात की, आता आम्ही निश्चिंत झालो.

शांतपणे झोपू शकतो. कारण ईडी, सीबीआयचा ससेमिरा मागे लागणार नाही. विरोधकांवर दबाव आणला जात आहे. कोणतेही आरोप केले जात आहेत. सातत्याने ईडीकडून समन्स पाठवण्यात येत आहेत. देशातील जनतेने याची दखल घेऊन त्यांना धडा शिकवावा अशी अपेक्षा आहे, या शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपावर टीका केली.

भाजपा हा एक डरपोक पक्ष

भाजपा हा डरपोक पक्ष आहे. लोकांमध्ये जायची त्यांच्यात हिंमत नाही. इव्हीएम किंवा चंदीगड पॅटर्न नसेल, तर भाजपा जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशच्या चंदौलमध्ये एका दुकानात २०० इव्हीएम मशीन मिळाल्या आहेत.

तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमध्ये ३००हून जास्त इव्हीएम मशीन सापडल्या. तो ट्रकही भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. हा काय खेळ आहे, अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.

दरम्यान, भाजपा आता मनसुखभाई किंवा चंदीगड पॅटर्ननेच निवडणुका लढवणार, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. २०२४ मध्ये कशा प्रकारे निवडणुका लढवल्या जातील, त्याची ही तयारी आहे. दोन पॅटर्न आहेत. एक मनसुखभाई पॅटर्न, जे इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे संचालक झाले आहेत. दुसरा चंदीगड फॉर्म्युला, अशी टीका संजय राऊतांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here