पावनखिंडीसाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांची घोषणा

0
46

कोल्हापूर : नरवीर बाजीप्रभू देशपांडे ज्या पावनखिंडीत धारातीर्थी पडले, त्या विशाळगडाजवळील पावनखिंडीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार मंजूर करत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली.

राज्यातील सर्व गडकोटांचे राज्य सरकार संवर्धन करते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानून राज्याचे सरकार आपण चालवतोय, असेही त्यांनी सांगितले. शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त उभारलेल्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ मूर्तीचे मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेत अभिवादन केले. यावेळी शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्याच्या प्रतिकृतीचे त्यांनी कौतुक केले आणि सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

ते म्हणाले, १९ तारखेला राज्यातच नव्हे तर देशभरात राज्य सरकार शिवजयंती साजरी करत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर, औरंगजेबाने शिवरायांना जेथे नजरकैदेत ठेवले त्या आग्रा शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल जरग यांनी मुख्यमंत्र्यांना मानाचा फेटा बांधला.

शिवशाहीर राजू राउत यांचा पोवाडा –
शिवशाहीर राजू राउत यांनी गायलेल्या रायगड आपल्या गावी या पोवाड्याला रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला.

देखावा पाहण्यास गर्दी प्रतापगडावरील अफजलखान वध, राजमहालातशाहिस्तेखानावर केलेला वार, हे शिवप्रतापाचे प्रसंग आणि राज्याभिषेकावेळी जिजाऊ माँसाहेबांचा चरणस्पर्श या प्रसंगासह काल्पनिक किल्ल्याची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here