
खोची प्रतिनिधी रोहित डवरी
खोची ( ता.हातकणंगले ) येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी श्रीपती गणपती पाटील ( तात्या ) यांचे रक्षाविसर्जन रितीरिवाजाप्रमाणे नदी पात्रात करण्याऐवजी तीन शेतात विसर्जन करुन एक आदर्शवत, प्रेरणादायी व पर्यावरणाचे रक्षण करण्याचा पायंडा पाटील परिवाराने पाडला.ही सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होवू नये यासाठी शासन,प्रशासन व ग्रामपंचायतीकडून प्रबोधन केले जाते.त्यासाठी उपक्रम राबविले जातात.नदी पात्रात मूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी मूर्ती दान केले जाते.निर्माल्याचेही संकलन केले जाते. नदीपात्रात रक्षाविसर्जन केल्याने पाणी प्रदूषित होते.शेतीची आवड असणाऱ्या तात्यांच्या राखेचे विसर्जन शेतात केल्याने त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल असे पाटील परिवाराने बोलून दाखविले.दुषित पाणी व वाढत्या प्रदूषणाचा विचार करता अशा पर्यावरणपूरक परंपरा सुरु करणे ही काळाची गरज आहे.