उसाला एकरकमी प्रतिटन ३००१ रूपये दर देणार?, कोल्हापुरातील चार साखर कारखान्याच्या बैठकीत निर्णय

0
63

शिरोळ : चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार प्रतिटन विनाकपात एकरकमी ३००१ रुपये देण्याचा निर्णय शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

याबाबत बुधवारी बैठक झाल्याचे समजते. श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर हुपरी आणि श्री दत्त शिरोळ या चार साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.

ऊस दराच्या प्रश्नावरून विविध संघटनांच्यावतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेतून मागील हंगामातील चारशे रुपये मिळावेत यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

येत्या सात नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. दरम्यान, एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी असल्याने हंगाम सुरू होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर चार कारखानदारांची ही बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत ३००१ रुपये प्रतिटन एकरकमी दर देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. याबाबत रात्री उशिरापर्यंत दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, ऊसतोड मजुरांच्या टोळ्यादेखील दाखल होत आहेत त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here