Kolhapur: थेट पाइपलाइनला गळती नाही, हा कोणाचा तरी खोडसाळपणा

0
63

कोल्हापूर : काळम्मावाडी – कोल्हापूर बहुचर्चित थेट पाईपलाईनला हळदी कुर्डू (ता.करवीर) दरम्यानच्या ओढ्यानजीक गळती लागली होती. मात्र, तपासणीअंती कोणी तरी खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हवा निघून जाण्यासाठी लावलेले नटबोल्ट काढल्यामुळे हे पाणी बाहेर पडल्याचे सांगण्यात आले.

जल वाहिनीतील हवा निघून जाण्यासाठी एअर व्हॉल्वबरोबरच व्हेंटपाइप काढल्या आहेत. या व्हेंटपाइपवर फ्लॅन्क लावण्यात आले आहेत. कोणी तरी अज्ञाताने याचे नटबोल्टच काढले असल्याचे आढळून आले.

कोणी तरी जाणकार व्यक्तीने या फ्लॅन्कचे नटबोल्ट काढले असावेत, असा संशय घेतला जात आहे. कोणाचा तरी खोडसाळपणा शहरवासीयांच्या पाणीपुरवठ्यावर उठण्याची शक्यता असल्याने जलवाहिनी, जॅकवेल, ट्रान्सफार्मर या ठिकाणी प्रवेश बंदी करायला पाहिजे. अन्यथा असे प्रकार यापुढेही घडू शकतील.

कोल्हापुरात पाणी पोहोचले

गेल्या नऊ वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइनचे पाणी अखेर कोल्हापुरातील पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर काल, शुक्रवारी रात्री पोहोचले.

काळम्मावाडीहून ५३ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून जेव्हा धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित असलेले माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी गुलालाची उधळण तसेच मोठ्या प्रमाणात आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला होता

कोल्हापूरकरांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्यावर पर्याय म्हणून काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने घेतला होता; तर ही योजना मंजूर होण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती. त्यानंतर राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेकरिता ४८८ कोटींना निधी मंजूर झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here