मनोज जरांगेंचे आंदोलन अन् APMC मार्केट बंद, शेतकऱ्यांनी माल विकायचा कुठे? बळीराजासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

0
59

Maharashtra Government decision: मनोज जरांगे यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली. ही पदयात्रा नवी मुंबईतून जाणार असल्याने याच्या समर्थनार्थ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

मराठा समाजातील आंदोलकांची राहण्याची व्यवस्था याच मार्केट परिसरात करण्यात आली.

मनोज जरांगे हे शुक्रवारी (26 जानेवारी) नवी मुंबईतून निघून मुंबईच्या दिशेने निघणार होते. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी वाशी येथेच थांबण्याचा निर्णय घेतला.

चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी अध्यादेश मिळण्यासाठी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. यामुळे एपीएमसी मार्केट शनिवारी सुद्धा बंदच राहणार आहे.

पण मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल विक्री कुठे करायचा असा प्रश्न उपस्थित झाला. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि मुंबई, आसपासच्या नागरिकांना अत्यावश्यक भाजीपाला, पदार्थ मिळावेत यासाठीच आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला मुंबईमध्ये वितरण करण्यास सवलत दिल्याने मुंबई, ठाण्यासह इतर नजिकच्या शहरांना शेतमाल, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी शासनाने उपाययोजना केल्या असून याबाबतचे शासन परिपत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले आंदोलक मुंबई परिसरात आले आहेत. आंदोलक नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सद्यस्थितीत मुक्कामी आहेत.

यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची व इतर खाद्य पदार्थाची आवक व पर्यायाने व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. परिणामी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्री साठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्द व ठाणे महानगरपालिका हद्द व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना भाजीपाला व इतर दैनंदिन खाद्यपदार्थांचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरीता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपाय योजना / पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालाचे वेळेत वितरण करण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच या महानगरपालिका हद्दीतील ग्राहकांना दैनंदिन भाजीपाला, फळे व इतर सर्व खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी संचालक, पणन, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य, कृषी पणन मंडळ, पुणे व सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आपसात समन्वय साधुन आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व संबंधित महानगरपालिका यांच्यासोबत संपर्क करुन ग्राहकांपर्यंत उपरोक्त शेतीमाल पोहण्याबाबतची दक्षता घ्यावी.

राज्यातील पुणे मार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे पनवेलनंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गे (अटल सेतू) बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व माल वाहतुकदारांनी मुंबई शहरातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोहचणार नाही अशा पद्धतीने तसेच छोट्या मंडईतील किरकोळ व्यापाऱ्यांना / ग्राहकांना विक्री करावा.

राज्यातील नाशिक मार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व माल वाहतुकदारांनी मुंबई शहरातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोहचणार नाही अशा पद्धतीने तसेच छोट्या मंडईतील किरकोळ व्यापाऱ्यांना / ग्राहकांपर्यंत विक्री करावा.

ही कार्य पद्धत अवलंबिण्यासाठी महाराष्ट्र शासनास प्राप्त अधिकारान्वये, ‘महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 चे कलम 59 अन्वये कलम 6 च्या तरतुदी मधून’ या परिपत्रकांन्वये सूट देण्यात येत आहे. पोलिस महासंचालक / आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर उल्लेखित महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिका क्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शेतमालाच्या वितरणामध्ये प्रतिबंध न करता सुलभता आणण्याबाबत सूचना द्याव्यात.

आयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी अटल सेतुवरील शेतमालाच्या सुरळीत वाहतुकीबाबत संबंधितांना सुचना द्याव्यात असेही शासनाच्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

… तर आझाद मैदानाऐवजी वाशीतच थांबतो

मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत काढा. अध्यादेशावर सर्वांच्या सह्या झाल्या आहेत. मग इतकेच झालं आहे तर अध्यादेश काढाच… अध्यादेश मिळावं म्हणून इथपर्यंत आलोय. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढेपर्यंत इथेच थांबतो. हवं तर आझाद मैदानाऐवजी वाशीतच थांबतो.

मनोज जरांगेंनी म्हटलं, सग्यासोयच्यांच्या संदर्भातील जो शासन निर्णय हवाय तो यामध्ये नाहीये. तुम्ही हे प्रयत्न केलेत आम्ही त्यासाठी इथपर्यंत आलोय. आम्हाला मुंबईत यायची हौस नाहीये.

आमची इच्छा आहे की, तुम्ही आजच्या रात्रीत हा अध्यादेश आम्हाला द्यावा. त्यांचं असं म्हणणं आहे की, ज्या सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसोबत आपण अध्यादेश करणार आहोत त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा केली आहे. पण माझं म्हणणं आहे की, इतकं झालंय तर तुम्ही रात्रीतून अध्यादेश द्या. वाटलं तर आजची रात्र इथेच काढतो. आम्ही कायद्याचा सन्मान करुन आम्ही आझाद मैदानात जात नाही पण मुंबई मात्र, आम्ही सोडणार नाही. प्रशासनाचाही सन्मान करतो. शासनाचाही सन्मान करतो. तुम्ही इतके केले आहे तर तो अद्यादेश द्या. तुम्ही रात्रीतून अध्यादेश नाही दिला तर मी उद्या आझाद मैदानात जाणार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here