कोल्हापूर, सांगली महापूर नियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी; क्षीरसागर यांची माहिती

0
194

 कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करण्याकरिता ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्यासाठीच्या चार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पास जागतिक बॅंकेने मंजूरी दिली आहे.

यातील सत्तर टक्के निधी हा जागतिक बँक तर तीस टक्के निधी हा राज्य सरकार देणार आहे. पुढील तीन महिन्यात प्रकल्पाच्या कामास सुरवात होईल. ‘मित्रा’चे उपाध्यक्ष तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली असून यास पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्या, मंगळवारी (दि.१३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता मित्रा संस्था कार्यालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

क्षीरसागर म्हणाले यांनी सांगितले की, जिल्ह्याला १९८९, २००५, २०१९ आणि २०२१ या वर्षात महापुराचा मोठा फटका बसला. महापूर आलेल्या प्रत्येक वर्षी पाण्याची पातळी वाढतच गेली. महापुराचा कोल्हापूर, इचलकरंजी, शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना विळखा पडतो. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले. व्यापारी, उद्योजक, लहान – मोठे व्यावसायिक आदींसह नागरिकांची प्रचंड हानी झाली. महापुराने पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग काही दिवस बंद राहतो. कोल्हापूर शहरात बहुतांश भागात पुराचे पाणी शिरल्याने शहर जवळपास ठप्प होते. कोल्हापूर कोकणाला जोडणारे राज्यमार्गही बंद होतात. या पार्श्वभूमीवर महापूर नियंत्रणाबाबत उपायोजना करण्यासाठी महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा महत्वाकांक्षी प्रकल्प आराखडा जलसंपदा विभागामार्फत करण्यात आला होता.

यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे असे दोन टप्पे करण्यात आले आहेत.

यातील पहिल्या टप्प्यास आवश्यक निधीस जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. मंजूर चार हजार कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल बांधणे, भूस्खलन उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरीत करणे, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे खरेदी करणे, पूरसंरक्षक उपाययोजना आदी कामे करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंगळवारी दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मित्रा संस्था कार्यालय, मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी माझ्यासह मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह देसाई, जागतिक बँकेचे प्रतिनिधी व संबधित विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक पार पडणार आहे.

माझे भाग्यच ….

कोल्हापूर सांगली जिल्ह्याकरिता एवढा मोठा निधी मंजूर करुन काहीतरी भरीव काम करण्याची संधी मिळाली, हे माझ्य भाग्यच आहे, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here