Satara: प्रेमीयुगुल पळाले; संतप्त नातेवाईकांनी युवकाच्या कुटूंबाला मारहाण करीत एकाचा खून केला

0
72

कऱ्हाड : प्रेमीयुगुल पळून गेल्यानंतर संतप्त झालेल्या युवतीच्या नातेवाईकांनी युवकाच्या कुटूंबाला मारहाण करीत एकाचा खून केला. जनार्दन महादेव गुरव (रा. राजमाची) असे खून झालेल्याचे नाव आहे.

सुर्ली, ता. कऱ्हाड येथील घाटात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद विश्वास पवार (रा. राजमाची, ता. कऱ्हाड) याने याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील युवती काही दिवसांपासून बेपत्ता आहे. त्या युवतीला राजमाचीतील युवकाने पळवून नेल्याचा युवतीच्या कुटूंबियांना संशय होता. त्या कारणावरुन युवतीचे नातेवाईक चिडून होते.

दरम्यान, सोमवारी रात्री युवतीचे नातेवाईक राजमाची येथे गेले. त्याठिकाणी त्यांनी संबंधित युवकाच्या कुटूंबियांना धमकावत युवतीला घेवून युवक कुठे गेला आहे, अशी विचारणा केली. मात्र, कुटूंबियांकडून त्यांना काहीच माहिती मिळाली नाही.

त्यामुळे युवतीच्या चिडलेल्या नातेवाईकांनी युवकाच्या आई, वडिल तसेच भावाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच भाऊ, वडिल व जनार्दन गुरव या तिघांना चारचाकी गाडीतून जबरदस्तीने सुर्ली घाटात नेवून त्याठिकाणीही लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत जनार्दन गुरव हे गंभीर जखमी होवून बेशुद्ध झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी जनार्दन गुरव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

याप्रकरणी मंगळवारी पहाटे कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here