Kolhapur Politics: पक्षावर अरिष्ट तरी राहिले एकनिष्ठ, कार्यकर्तेही निष्ठावंतच..

0
59

 एक पक्ष..एक विचार, एकच झेंडा खांद्यावर घेऊन हयातभर राजकारण करणारे नेते म्हणून जिल्ह्याच्या राजकारणातील अनेकांची ओळख जनमाणसांत घट्ट झाली आहे. सत्तेसाठी वैचारिक भूमिका नदीला सोडून कोणत्याही पक्षात उड्या मारणाऱ्यांची सध्या चलती आहे.

त्या पार्श्वभूमीवर पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचे वेगळेपण उठून दिसते.

राजकारण हे समाजसेवेचे साधन होते तेव्हा लोक अनेक वर्षे एकाच पक्षाशी बांधील राहून काम करत होते. अनेकवेळा पराभव होऊनही दुसऱ्या पक्षात जाऊन पद, सत्ता मिळवावी असे त्यांना वाटले नाही. परंतु हल्ली सत्ता नसेल तर आपल्या जगण्याला काही अर्थ राहिला नाही असे राजकीय पुढाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठा, आजपर्यंतची वैचारिक जडणघडण, कार्यकर्त्यांचा विचार यापैकी कशाचीही फिकीर न बाळगता राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात घाऊक उड्या मारत आहेत. त्यांना बळ देणारेच सरकार राज्यात आणि देशात सत्तेवर असल्याने या राजकारणाला ऊत आला आहे. कार्यकर्तेही आम्ही साहेबांसोबतच असे जाहीर करून या पक्षांतराला पाठबळ देत आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार, शेकापचे त्र्यंबक सीताराम कारखानीस, शाहूवाडीचे राऊ धोंडी पाटील, गोविंदराव कलिकते, राधानगरीचे जनता दलाचे नेते शंकर धोंडी पाटील, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, श्रीपतराव शिंदे, प्रा. एन. डी. पाटील, संपतराव पवार, आमदार पी. एन. पाटील यांची जिल्ह्याच्या इतिहासात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. साधारणत: १९९० च्या दशकांपर्यंत लोक विचारधारा, राजकीय पक्षाशी निष्ठा याला महत्त्व द्यायचे. सत्तेसाठी राजकारण असे त्याचे स्वरूप झाल्यावर दलबदलूपणा वाढला.

संपतराव पवार व आमदार पी. एन. पाटील हे एकाच मतदार संघातील परस्परांचे राजकीय विरोधक परंतु त्यांच्यातील पक्षाशी बांधीलकी हा समान गुण महत्त्वाचा ठरला. पक्ष अडचणीत असताना पी. एन. यांनी जिल्ह्यात पक्षाची धुरा सांभाळली. संधी असतानाही ती ठोकरून ते झेंड्याशी प्रामाणिक राहिले. विधानसभेची २००४ ची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकल्यानंतर सतेज पाटील काँग्रेसशी एकनिष्ठ राहून जिल्ह्यात आणि राज्यातही पक्षाला बळ देत आहेत. त्या बळावरच त्यांना पक्षातही आगामी काळात चांगली संधी आहे. माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे घराणेही पक्षाशी बांधील राहिले आहे. पन्हाळ्याचे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील हेदेखील काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिले.

कार्यकर्तेही निष्ठावंतच..

भाजपमध्येही सुभाष वोरा, मिश्रीलाल जाजू, शंकरराव पुजारी, कर्नल शंकरराव निकम, बाबा देसाई, बापू मासाळ, रमाकांत सलगर, बाबुराव जोशी, बाबुराव कुंभार, महादेव टोपले, अण्णा नार्वेकर, ज. गो. कुलकर्णी असे काही निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे निष्ठेने काम करत होते. काँग्रेसचा कोणताही मुख्यमंत्री आला की, त्याला काळे झेंडे दाखवायला ही मंडळी पुढे होती. त्यावेळी पक्ष कधी सत्तेत येईल हे त्यांना माहीत नव्हते परंतु ते काम करत राहिले. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाला बळ आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here