प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: राज्यात १७ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पण, ही मुदत संपण्यापूर्वीच अप्पर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढीचे आदेश काढले आहेत. आता मराठा समाजातील ‘एसईबीसी’ प्रमाणपत्रासाठी पात्र उमेदवारांकडून पोच पावती जोडूनही अर्ज करता येणार आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्याचा शासन निर्णय देखील पोलिस भरती प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी निघाला आहे. त्यानुसार या भरतीत एसईबीसी प्रवर्गातील तरूणांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, शासन निर्णयानंतरही मराठा तरूणांना एसईबीसी प्रमाणपत्र मिळू शकलेल नाही. शासनाच्या संकेतस्थळावर तशी सुविधा अद्याप उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर ‘एसईबीसी’साठी पात्र तरूणांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ३१ मार्च पर्यंत मुदतीपर्यंत काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे एसईबीसीचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती अर्जासोबत सादर करावी. मात्र, कागदपत्रे पडताळणीच्यावेळी उमेदवार कडे सर्व कागदपत्रे असने जरूरीचे आहेत, असेही आदेशात नमूद आहे.

