प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा नागपूर : नागपूरमध्ये पार पडत असलेल्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे,आमदार वरूण देसाई आणि अनिल परब या नेत्यांसह दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे. शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र या शपथविधीला ठाकरे जाऊ शकले नव्हते. त्यामुळेत उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा देण्यासाठी आजची भेट घेतल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे आम्ही निवडणुक जिंकू शकलो नाही.ते जिंकले आणि त्याचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे साहाजिकच आहे या सरकारकडून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच जे निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते अनाकलनीय आहेत त्यामुळे जनतेच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आवाज उठवू, अशी भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी मांडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्य़क्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते कोणाचा असावा यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राहुल नार्वेकर आणि देवेंद्र फडणवासांची ठाकरेंनी अचानक भेट घेतल्या नंतर चर्चांना उधाण आले आहे.