
पाचगाव (प्रतिनिधी):पांडुरंग फिरंगे
“जनता हेच माझे दैवत आहे” या भावनेतून सतत लोकांच्या सेवेत राहणारे माजी लोकनियुक्त सरपंच संग्राम गोपाळराव पाटील यांनी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. जनतेचा विश्वास आणि पाठींबा आपल्या पाठीशी असल्याने विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाचगाव परिसरातील पाणीटंचाईचा जळजळीत प्रश्न आमदार सतेज पाटील पालकमंत्री असताना निकाली काढण्यात संग्राम पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक वर्षांची पाण्यासाठीची भटकंती थांबवून नागरिकांना दिलासा देणारे हे काम आजही ग्रामस्थांच्या स्मरणात आहे.

गावासह कॉलनीमधील रस्ते, गटारी, मूलभूत सुविधा, गरजूंना वेळोवेळी मदत, तसेच कोरोना महामारीच्या कठीण काळात अन्नधान्य, औषधे व मदतीचा हात देत संग्राम पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
तरुण मंडळाच्या माध्यमातून लोकसहभागातून अनेक विकासकामे पूर्ण करत त्यांनी “नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे, तर जबाबदारी” हे सिद्ध केले.
सध्या पत्नी लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील या माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार असून, या विकासाच्या भक्कम पायावरच संग्राम पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेतली आहे.

“सत्ता नव्हे, सेवा हाच माझा ध्यास आहे. जनतेच्या विश्वासावरच माझे राजकारण उभे आहे,” असे भावनिक उद्गार काढत संग्राम पाटील यांनी नागरिकांचे आशीर्वाद कायम लाभतील, असा विश्वास व्यक्त केला.
विकास, विश्वास आणि सेवाभाव यांचा त्रिवेणी संगम असलेले हे नेतृत्व पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत पोहोचण्यासाठी सज्ज झाले असून, पाचगाव मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.


