
प्रतिनिधी : मेघा कोलतकर
रत्नागिरी, दि. ७ फेब्रुवारी : उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. मतदान सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडावे यासाठी सर्व आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात एकूण १,६९३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ४,२८६ मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ५,४५५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान केंद्रे रत्नागिरी तालुक्यात आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेमधील ५६ जागांसाठी २२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच ९ पंचायत समित्यांतील ११२ गणांसाठी ४३४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ११,७३,८९९ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार ५,६४,९७६ तर महिला मतदार ६,०८,९९३ आहेत.
मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
— मेघा कोल्हटकर, जिल्हा संपादक, रत्नागिरी

