कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बंदी आदेश; 21 ऑक्टोबरपर्यंत आदेश लागू राहणार

0
491

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटस ठेवले जात आहेत.

त्यामुळे जमाव करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याने या दरम्यान एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून जातीय तेढ निर्माण होवू नये, यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दि. 21 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

बंदी आदेशानुसार कोणता प्रतिबंध असेल?

कलम 37 (1) अ ते फ : अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. (ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडण्याची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. (ड) व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. (इ) जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे.

कलम 37 (3) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे. हा आदेश जे सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना वरील वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here