Kolhapur Politics: ‘स्वाभिमानी’ लोकसभा स्वतंत्र लढविणार, राजू शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ

0
82

इचलकरंजी : सत्ताधारी आणि विरोधी या दोघांचेही हात बरबटलेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष मतदारांसमोर स्वतंत्रपणे जाणार आहे. मतदारांना जे करायचे आहे, ते करतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यानिमित्ताने फोडला.

मकर संक्रांतनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा वेदभवनमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, सगळे जण स्वार्थासाठी पक्ष सोडून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. निकाल देतानाही चुकीच्या पद्धतीने दिला जात आहे. हेही पात्र आणि तेही पात्र, मग मतदार अपात्र आहेत का, असा प्रश्न पडतो. व्यवस्था पूर्णपणे बरबटलेली आहे. त्याला स्वच्छ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सरकारचे धोरण महागाई यावर आवाज उठविण्याची कुणाची ताकद नाही. मीच त्यावर आवाज उठवू शकतो.

निवडणुकीकडे आता गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. मी सभागृहात नसल्याची जाणीव आता होत आहे. केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांचे रेकॉर्ड चांगले असले पाहिजे. जे ईडीला घाबरत नाहीत, तेच प्रश्न विचारू शकतात, ती धमक माझ्यात आहे. तुटलेल्या उसाचे पैसे मागत असताना खुळ्यात काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपण ही रक्कम वसूल करून दाखवली. ते फक्त स्वाभिमानीच करू शकते. आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या हातात एक हजार कोटी रुपये पडले. ३७ कुटुंबांकडून रक्कम काढून घेऊन ती १५ लाख कुटुंबांना वाटण्यात आली. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यामुळे ती रक्कम बाजारात आली आणि त्याचा सर्वच घटकांना फायदा झाला.

जालंदर पाटील म्हणाले, सर्वप्रथम प्रचाराचा प्रारंभ करणारा स्वाभिमानी हा राज्यातील एकमेव पक्ष असेल. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता रणनीती आखली पाहिजे. पुरोगामीचा विचार असणारा कोल्हापूर जिल्हा शेट्टींना तिसऱ्यांदा खासदार करेल. सावकार मादनाईक म्हणाले, मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवारी प्रचाराचा नारळ फुटत आहे. शरद पवारांची भेट घेतली म्हणजे त्यांच्यासोबत गेलो, असे नाही. स्वतंत्रपणे खासदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागावे.

स्नेहमेळाव्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. विकास चौगुले, गोवर्धन दबडे, आप्पा ऐडके, सागर संभूशेटे आदींची भाषणे झाली. अण्णासाहेब शहापुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, बाळगोंड पाटील, स्वस्तिक पाटील, बसगोंडा बिरादार, पुरंदर पाटील, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here