कोल्हापुरातील पंचगंगा नदीमधील पाणीपातळी घटली; इचलकरंजीस होणारा उपसा बंद, पाण्यास काळपट रंग

0
39

इचलकरंजी : शहरास पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पंचगंगा नदीमधील पाणीपातळी कमी झाल्याने आणि पाण्यास काळपट रंग आल्याने महापालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उपसा रविवारपासून बंद करण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली आहे.

शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पंचगंगा नदीमधील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याला काळपट रंग आला आहे. पंचगंगा नदीमधून रविवार, सायंकाळी ७:३० वाजल्यापासून पाणी उपसा बंद करण्यात आला. जोपर्यंत पंचगंगा नदीतील पाण्याची किमान पातळी होत नाही, तोपर्यंत शहरासाठी होणारा पाणीउपसा बंदच ठेवण्यात येणार आहे. पंचगंगा नदीमध्ये पाणीपातळी सुस्थितीत ठेवण्याकरिता पाटबंधारे विभागास महापालिकेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.

या दरम्यानच्या कालावधीमध्ये शहरास कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच पंचगंगा नदीवरून पाणी पूर्ववत उपसा होईतोपर्यंत आपणास मिळणारे पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिवटे यांनी नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here