“मोदींवर चार आण्याच्याही घोटाळ्याचा आरोप नाही”; ED च्या प्रश्नावर अमित शाह यांचं उत्तर

0
53

नवी दिल्ली – देशात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईला विरोधकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. भाजपाने केवळ आकसापोटी विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं असून ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काहींना लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलं आहे.

तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवाईला विरोधही केला जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अद्यापही ईडीच्या चौकशीला न जाता विरोध केला.

तर, ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील प. बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आला. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. तसेच, ह्या कारवाया देशातील भ्रष्टाचाराल उघडं पाडत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

प. बंगालमधील संदेशखालीमध्ये तपास यंत्रणांवर हल्ला करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांवर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर हा गंभीर मुद्दा आहे. कारण, राज्य आणि केंद्रीय संस्थांमधील वाद वाढत असल्याच्या संदर्भाने गृहमंत्री अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर, उत्तर देताना अमित शाह यांनी ही समस्या गंभीर वाटत नसल्याचं म्हटलं. अमित शाह यांनी देशातील केंद्रीय संस्थांकडून होत असलेल्या धाडीवरुन भाष्य करताना, विरोधकांना आणि प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लक्ष्य केलं.

लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीला उत्तर जनता देत असते. पश्चिम बंगालमध्ये ५२ कोटी एकत्र सापडतात. झारखंडमध्ये ३५५ कोटी रुपये रोकड आढळून येते. पैसे मोजता, मोजता मशिन्स गरम होतात.

तरीही हे सर्वजण म्हणतात, आमच्यावर कारवाई करू नका. युपीए सरकारविरुद्ध ४० केस फक्त युपीएला दाखल करावे लागले. आम्ही विरोधात होतो, संसदेत प्रश्न उपस्थित करत होतो, पीआयएल करत होतो, तेव्हा कोर्टाच्या आदेशानंतर तपास केला जात होता.

त्यावेळी, तुम्हीच सत्तेत होतात, या देशात न्यायालये आहेत. जर, कोणावर अन्याय होत असेल तर न्यायालयात जावा. मात्र, १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे करणारे लोक तपासाला घाबरतात. म्हणूनच, ते असं वातावरण तयार करतात.

१२ लाख कोटींच्या घोटाळ्यांचा तपास आज आपल्यासमोर होत आहे. दुसरीकडे २३ वर्षांपासून नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पंतप्रधान राहिले आहेत.

गेल्या १० वर्षांपासून देशात आमचं सरकार आहे. पण, चाराण्याच्या घोटाळ्याचा देखील आरोप विरोधक नरेंद्र मोदींवर लावू शकले नाहीत, असे म्हणत अमित शाह यांनी ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले.

तसेच, आम्ही पारदर्शकपणे सरकार चालवलं, सध्याच्या कारवाईतून हे सगळे उघड पडत आहेत. संदेशखाली येथील घटनांनी प. बंगालमधील सरकारला १०० टक्के उघडं पाडलं आहे, महिला मुख्यमंत्र्यांच्या राज्यात धर्माच्या आधारे महिलांचं शोषण होत आहे, ते सहन केलंच जाऊ शकत नाही. आम्ही जोर लावून इथे लढाई लढू आणि प. बंगालमध्ये परिवर्तन घडवू, असेही शाह यांनी कडक शब्दात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here