घरगुती वादातून मुलाने केला वडिलांचा खून राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील घटना

0
193

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ‌केळोशी बुद्रुक येथे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवार दि ७ मे रोजी केळोशी बुद्रुक येथील सावरमाळ’ नावाच्या शेतामध्ये उघडकीस आली. तुकाराम दौलू मगर वय ६५ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नातू आकाश आनंदा मगर याने चुलत्यांच्या विरोधात राधानगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. घरगुती वादातून ही खुनाची घटना घडली.याप्रकरणी संशयित प्रकाश मगर याला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत राधानगरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, केळोशी बुद्रुक ता. राधानगरी येथील तुकाराम मगर व मुलगा प्रकाश यांच्यामध्ये दोन दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. यातूनच दोघांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवार ६ मे रोजी वडील तुकाराम मगर हे ‘सावरमाळ’ नावाच्या शेताकडे गेले होते. यावेळी मुलगा प्रकाश याने भांडणाच्या रागातून दोरीने गळा आवळून वडील तुकाराम यांचा खून केला.
मंगळवार दि ७ मे रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नातू आकाश मगर याने पोलिसांत फिर्याद दिली. संशयित आरोपी प्रकाश मगर याने वारंवार होणाऱ्या भांडणाचा राग मनात ठेवून वडिलांचा गळा आवळून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार राधानगरी पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकूर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी संशयित प्रकाश मगर याला अटक केली. या घटनेमुळे राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष गोरे, उपनिरीक्षक महेश घेरडीकर, हेड कॉन्स्टेबल खामकर, कृष्णात यादव अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here