
ऊसतोडीनंतर रानाची मशागत करताना व दुसऱ्या पिकासाठी शेतजमीन तयार करताना ग्रामीण भागातील शेतकरी.
कोतोली | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
दुसऱ्या पिकासाठी शेतकरी सज्ज
ग्रामीण भागातील शेतकरी सध्या शेतीच्या कामात पूर्णतः मग्न झाले असून ऊसतोड संपताच शेतशिवारात नवचैतन्य दिसून येत आहे. ऊस तुटून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ रानाची मशागत, नांगरणी व जमीन तयार करण्याची कामे सुरू केली असून पुन्हा दुसरे पीक घेण्यासाठी ते जोमाने तयारी करत आहेत.
ऊस पिकानंतर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी खोल नांगरणी, सरी काढणे, खतांची मात्रा ठरवणे तसेच पाणी व्यवस्थापनाकडे शेतकरी विशेष लक्ष देत आहेत. काही भागात हरभरा, मका, भाजीपाला तर काही ठिकाणी उन्हाळी पिकांच्या लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

सध्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतशिवारात ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटरच्या आवाजाने परिसर गजबजलेला असून ग्रामीण भागात कामाचा उत्साह पाहायला मिळत आहे. वाढत्या उत्पादन खर्च, पाण्याची अनिश्चितता आणि बाजारभावातील चढउतार असूनही शेतकरी नव्या आशेने पुढील पिकाकडे वाटचाल करत आहेत.शेती हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होत असून, शेतकऱ्यांच्या कष्टातूनच गावांचे अर्थचक्र चालते, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.


