
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी (कोतोली) येथे हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासमवेत सिनेट सदस्य व ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ. उषा पवार, डी. आर. धडेल, विश्वजा पाटील व सीमा पाटील.
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी (कोतोली) येथे ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन अत्यंत श्रद्धेने साजरा करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने महाविद्यालयात हुतात्म्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी सांगितले की, हुतात्मा दिन हा केवळ शहीदांना आदरांजली वाहण्यापुरता मर्यादित नसून, तो आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आजच्या पिढीने स्वातंत्र्याची खरी किंमत ओळखून देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर ती एक मोठी जबाबदारीही आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
हुतात्मा दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहणे हा आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्य लाभले असल्याची माहिती सिनेट सदस्य डॉ. उषा पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या समर्पण भावना व बलिदानाची आठवण करून देणे हा या दिवसाचा खरा अर्थ असल्याचे त्यांनी नमूद केले.
हुतात्मा दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी श्रीमती सीमा पाटील, श्रीमती विश्वजा पाटील, डी. आर. धडेल तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

