
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
साहित्य, समाज, कला आणि संस्कृती यांची सुसंवादी सांगड घालत महाविद्यालयीन युवकांच्या भाषा कौशल्यांचा विकास करण्याचे भरीव कार्य विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील वाड्.मय मंडळाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. युवकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेऊन नवोदित लेखक, कवी आणि विचारवंतांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील वाड्.मय मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत पाचवे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.
या भव्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. उद्घाटन समारंभास संस्थेच्या सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. श्री. कौस्तुभ गावडे, तसेच आय.क्यु.ए.सी.च्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध लेखक श्री. किरण गुरव यांची विशेष मुलाखत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, युवकांना थेट साहित्यविश्वातील अनुभवी लेखकांशी संवाद साधण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.
तर दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध कवी विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचे कवी संमेलन होणार असून, नव्या कवितेच्या सर्जनशील अभिव्यक्तीस मुक्त वाव दिला जाणार आहे.
या संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत आयोजित भव्य ग्रंथदिंडीने होणार असून, साहित्यप्रेमींसाठी ही एक आगळीवेगळी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनाचा लाभ जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, रसिक, विद्यार्थी, प्राध्यापक व विचारवंतांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व वाड्.मय मंडळ प्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले आहे.

