
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी रोजी संपूर्ण देशभर हुतात्मा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून विवेकानंद कॉलेजमध्ये हुतात्मा दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शुक्रवार, दि. 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता कॉलेजच्या ग्रंथालयासमोरील प्रांगणात उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरात अत्यंत शिस्तबद्ध व भावनिक वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमास मा. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून देशप्रेम, एकता व कर्तव्यनिष्ठेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प केला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची जाणीव जागृत होऊन राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

