
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
येथील विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न झाला.या पंधरवड्याच्या कालावधीत व्याख्याने, निबंध, वक्तृत्व, शुद्धलेखन, अभिवाचन स्पर्धा तसेच शासकीय मुद्रणालय भेट असे विविध भरगच्च व अभ्यासपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते झाले. “बोलीचा जागर” या विषयावर मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर “मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी” या विषयावर डॉ. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.शासकीय मुद्रणालयाच्या भेटीदरम्यान तेथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मुद्रणालयाच्या कार्यपद्धतीसह त्यातून उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगार संधींची सविस्तर माहिती दिली. या पंधरवड्यात आयोजित करण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, शुद्धलेखन व अभिवाचन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.या संपूर्ण उपक्रमाचे यशस्वी संयोजन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर, प्रा. डॉ. प्रदीप पाटील व प्रा. रोहिणी रेळेकर यांनी केले.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमान, सर्जनशीलता व रोजगाराभिमुख दृष्टीकोन अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

