
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
- “मुलांना सुरक्षिततेची जाणीव झाली तरच ते प्रगती करू शकतात” : ईशा अंबानी
- भारतासह जगभरातील २५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मांडले आपले विचार
- खेळाधारित शिक्षण आणि एआयच्या भूमिकेवर विशेष भर
मुंबई, १० फेब्रुवारी २०२६: रिलायन्स फाउंडेशनच्या ‘बिल्डिंग फ्लॉरिशिंग फ्युचर्स’ या परिषदेत शिक्षणाच्या प्रारंभिक टप्प्यांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या परिषदेत बोलताना रिलायन्स फाउंडेशनच्या संचालिका ईशा अंबानी यांनी सांगितले की, मुलांच्या भावनिक आणि सामाजिक गरजा समजून घेत दिलेले शिक्षणच खऱ्या अर्थाने प्रभावी ठरते.

ईशा अंबानी म्हणाल्या, “मुलांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक अवस्थेनुसार शिक्षण मिळाले, तर शिकण्याची प्रक्रिया अर्थपूर्ण आणि आनंददायी होते. रिलायन्स फाउंडेशनमध्ये आमचा ठाम विश्वास आहे की, मुलांना सुरक्षित, प्रेमळ आणि सन्मानित वातावरण मिळाले, तरच ते आत्मविश्वासाने पुढे जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पूर्ण क्षमता गाठता यावी, यासाठी समावेशक शिक्षणव्यवस्था उभारण्यावर रिलायन्स फाउंडेशनचा भर आहे.”
या दोन दिवसीय परिषदेत भारतासह परदेशातून आलेल्या २५० पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी प्रारंभिक व प्राथमिक शिक्षणातील नवकल्पना, खेळाधारित अध्ययन, मूलभूत साक्षरता तसेच एआयची भूमिका याविषयी आपले अनुभव आणि दृष्टिकोन मांडले. यावेळी ‘पेडागॉजीज ऑफ प्ले’ या नावाचे एक प्रकाशनही सादर करण्यात आले असून, त्यामध्ये मुलांसाठी शिकण्याच्या नव्या आणि प्रभावी पद्धती अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

